Tuesday 28 February 2012

बदल व्हायला पाहिजे ना






          बदल व्हायला पाहिजे ना.
      काल मी एका विवाह सोहळ्याला गेले होते.खरच तो एक सोहळाच होता.सगळेजण आनंदात होते.आपापलं काम करत होते.मजेत होते.मलाही मस्त वाटत होतं कारण उन्हाळ्यातलं पहिलं आईस्क्रीम माझ्या हातात होतं.त्यामुळे मला गार-गार वाटत होतं.तर अचानक मागून आवाज आला की सगळं बदलयं.म्हणजे काय बदलयं ? तर राहणीमान,मजा करण्याच्या पद्धती,घरातील सर्व आधुनिक फर्निचर आणि उपकरणे.नवीन आलीत म्हणजे बदल झाला.असं त्यांना म्हणायचं होतं.अजून एक आवाज होता तो माणसामाणसातील संपर्काची साधने बदलली.आणि लगेच गाडी नव्या पिढीवर आली,तरूण मुला-मुलींचे लग्न यावर आली.त्यांच्या गंमती-जमती सांगायला सुरुवात झाली.मग सगळ्यांचा उत्साह अगदी ओतू जात होता.मुला-मुलींच्या लग्नाच्या गोष्टी निघाल्या.प्रत्येकजण आपला अनुभव तावातावाने सांगू लागला.
      ते सगळेजण काय म्हणत होते याचं थोडक्यात सार सांगते.लोक योग्य प्रतिसाद देत नाही.फोनवर नीट बोलत नाही.स्थळ आवडलं की नाही याचा निर्णय लवकर देत नाही.टांगून ठेवतात.आम्हांला वेळ नाही असं सांगतात.फोटो पाठवा म्हटलं तर देत नाही.पत्रिका आधी बघायची नाही असं म्हणतात नंतर बघतात.येतो म्हणतात आणि पण येत नाही.अशा अनेक गोष्टी ते सांगत होते.त्या गरम चर्चेने माझं आईस्क्रीम पार वितळून गेलं.पण आता मी या चर्चेतून काही उत्तर मिळतं का ते बघत होते.पण सगळेजण चिडीला आले होते.मग त्यांनी शहरानुसार लोकांना नावं ठेवायला सुरुवात केली .पुण्याची माणसं अशी,नाशिकची तशी.मुंबईची तर आणखीनच वेगळी.प्रत्येक शहराबद्दल तक्रार होती.
      या तक्रारीत अजून एक गोष्ट लक्षात येत होती ती म्हणजे सगळ्यांना बदल व्हायला हवा होता पण दुसऱ्यामध्ये. ते स्वतः कोणीच बदलायला तयार नव्हते.कारण ते ही मुला-मुलीचे पालक होते. ते स्वतः दुसऱ्या कडून ज्या अपेक्षा करतात त्या गोष्टी करतात का? हे मात्र बघत नव्हते.त्यांना बदल हवा होता पण समोरच्या व्यक्तीकडून.कसं शक्य होतं ते? कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतः पासूनच व्हायला पाहिजे.ती जबाबदारी ते घ्यायला मात्र टाळत होते.
  घरामध्ये असलेली २८-३० वर्षाची मुलं-मुली लग्न न करतात वावरतात तेव्हा हे पालक अधिकच चीड-चीड करतात. कारण नक्की काय केलं म्हणजे ते मुला-मुलीचे लग्न वेळेत होईल आणि त्यासाठी त्यांना फार तोशीस पडणार नाही.असं त्यांना वाटत असतं.अर्थात यात त्यांची खूप मोठी चूक आहे असं नाही.कारण सभोवताल इतक्या झपाट्याने बदलत आहे.त्यामुळे हे ही काही प्रमाणात बदलतात पण ते त्यांच्या लक्षात येत नाही.मुलाने जर सांगितलं की मला ना तुम्ही सांगाल त्या मुलीशी आणि आपली संस्कृती जपणारी मुलगी हवी. तर पालक खूश होतात आणि बघा आमचा पिंट्या कसा बदलला नाही याची फुशारकी मारतात. पण पिंट्याची  आवड ही बदलत असते.आज जर त्याला पुरणपोळी आवडत असेल तर काही दिवसांनी त्याला चायनीज आवडायला लागेल.मुळात मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने काम केले पाहिजे.कारण प्रत्येकजण कामात असला तरी लग्नाचे वय तेच राहत नाही.वय वाढले अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण आणि आपली कामं यांची जोडी तर इतकी वर्ष चालूच आहे पण मुलांसाठी एक योग्य जोडीदार शोधण्याची वर्ष मात्र फार कमी आहेत.म्हणून योग्य ते नियोजन करून आणि मुला-मुलींनी स्वतःला ओळखून,वास्तवादी अपेक्षा ठेवून पालकांशी संवाद साधायला हवा.आणि पालकांनी सुद्धा त्यांच्या वेळचं कसं होतं हे अनेक वेळा न सांगता आज कोणती कृती करणं महत्वाची आहे हे बघून संवाद साधायला हवा.
    मुलां मध्ये झालेले मानसिक बदल लक्षात घेणे गरजेचे आहे.तरच त्यांच्या लग्नासाठीच केवळ नाही तर समाजातील संवाद टिकवण्यासाठी आपण काही करू शकू.आपण सर्वचजण भेटलो की म्हणत असतो की आज कोणी कोणा कडे जात नाही,गप्पा रंगत नाही,उगीचच कोणी कोणाच्या घरी जात नाही,नातेवाईक राहयला येत नाही.वगैरे.पण या सगळ्या गोष्टी आपण करतो का? दुसऱ्याने आपल्याकडे यावे म्हणून बोलावणं करतो का?गप्पा रंगतील असा वेळ आहे असं दाखवतो का?अशा प्रकारचं वातावरण तयार करायला आपण कमी पडतो.म्हणूनच बदल हवा असेल तर स्वतःपासून बदलायला सुरुवात करायला हवी. नाही का?  

Friday 24 February 2012

चर्चा हवीच.



 


मला मुळी अशा रूढ पद्धतीने लग्नच करायचं नाही.माझं असं,माझं तसं.असं  प्रज्ञा तावातावाने आम्हांला सांगत होती. तिला अनेक जणांनी साथ दिली.विवाह पूर्व मार्गदर्शनाच्या  कार्यशाळेचा शेवटचा टप्पा चालू होता. तेवढ्यात या सगळयांनी एकच कल्हा केला. म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एका रविवारी कॉलेजमध्येच 'लग्न' या विषयावर मोकळेपणी बोलण्यासाठी एकत्र जमायचं आणि खूप बोलायचं.
   विवाह,कुटुंब या समाज जीवनातल्या महत्वाच्या संस्था आहेत. लग्न ही महत्वाची आणि प्रत्येकाला करून बघावी अशी वाटणारी घटना आहे. असं मानतात. तरून मुला-मुलीना लग्नासंदर्भात अनेक प्रश्न पडतात,काही बदल करावेसे वाटतात. तरीपण या एका महत्वाच्या घटनेविषयी फारशी देवघेव होत नाही. तरुण मुलंही आपसात या संदर्भात बोलत नाही. काहीजण मात्र गंभीरपणे व प्रामाणिकपणे बोलतात.
    आमच्या "या" या आमंत्रणाला मान देवून कॉलेजच्या आवारात अनेकजण जमले होते. त्यात नवविवाहिता  बरोबरच अविवाहित,आजी-आजोबा शोभतील असेही लोक आले होते. यातील काहींना  निमंत्रित वक्ते बोलण्यासाठी  हवे होते. पण आम्ही त्या कार्यक्रमाचे स्वरूप चर्चेचे ठेवले होते. त्यामुळे आमच्या एका मैत्रिणीने प्रत्येकाला बोलण्याची ,विचार मांडण्याची संधी मिळेल.अशा पद्धतीने संचलन केले.त्यामुळे ज्यांना 'लग्न' या घटनेबद्दल आस्था आणि काळजी होती ते प्रत्येकजण संवाद साधू लागले. आमच्या असे लक्षात आले की खूप जणांना बोलायचं आहे,त्यांच्या मनात काय काय खदखदत आहे. लग्नासाठी निवड करतांना येणाऱ्या अडचणी,घुसमट ,अपमान खूप आहे.त्यात अहंकाराचे पाडाव ही भरपूर आहेत.त्यात वरपक्ष,घराणं ,सांपत्तिक स्थिती,वधूपक्ष याही गोष्टींचा समावेश आहे. तसेच दोन पिढ्यातील अंतरामुळे येणारा विषम दृष्टीकोन आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत.
   हे सगळं ऐकतांना ,बोलताना आमच्या लक्षात येत होतं की असा एक गट कायमस्वरूपी एकमेकांना भेटायला हवा. त्यांनी चर्चा करून मार्ग काढायला हवा. म्हणजे काही कृतीशील योजना कार्यान्वित होईल आणि वैचारिक स्पष्टता येईल. मला जोडीदार कसा हवा हे बघतांना स्वतःची ओळख पटायला हवी.मला केवळ खाणं-पिणं ,पोषाख यापलीकडे काय आवडत.माझी जीवनशैली -कार्यशैली काय आहे हे कळायला हवं.
   तसेच लग्न/विवाह का केला जातो याची यादी केली तर काय दिसेल? मुलींच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला जीवापाड प्रेम करार,आधार देणारा,सोबत देणारा जोडीदार हवा असतो.स्वतःच आपलं 'घर'हवं असतं. आई-वडिलांची काळजी कमी करायची असते. लहान बाळाची आवड असते. मुलांच्या दृष्टीने विचार केला तर एक हक्काचं माणूस मिळवायचं असतं किंवा चारचौघांसारखा संसार करावा वाटतो. एका छान जोडीदाराची सोबत हवी वाटते.
   सोबत हवी असं दोघानंही वाटते. पण निवड कशी करायची हे कळत नाही. पण जन्माचा जोडीदार निवडतांना रूप सर्वात महत्वाचं नाही हे लक्षात ठेवायला हवं फक्त बघताक्षणी नकोसेपणाची भावना मनात येत नाही ना? हे बघायला हवं. किमान आर्थिक सुरक्षितता आणि त्यासाठी मुलभूत शिक्षण कर्तृत्व यांचाही विचार ओघानच आला. आरोग्याचा विचारही करावा.पण या सर्वांच्या पलीकडे अजून कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात .उदा. वाचन,संगीत,खेळ,प्रवास,सामाजिक काम,नोकरी-करीयर ,अभ्यास   इ. किंवा natk-सिनेमा ,दारू ,सिगारेट ,खरेदी इ. यासारख्या कुठल्या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या वाटतात आणि त्या जोडीदाराला फालतू किंवा अत्यंत गैरलागू वाटत असतील तर त्याबाबत एकमेकांशी बोलायला हवं .कारण तारुण्य सुलभ शारीरिक ओढ आणि एकूणच संसारिक जीवनातील नवलाईचा पहिल्या काही वर्षांचा काळ ओलांडल्यावर खर वास्तव दिसायला लागतं.म्हणूनच हे सारं प्रत्यक्षात दिसण्यापुर्वी लग्न ठरवतांना वरील गोष्टींचा मोकळेपणी विचार करायला हवा.कारण आपल्याला लग्न केवळ टिकवायचे नाही.तर त्यातून ताज्या टवटवीत माणूसपणाचा अनुभव घ्यायचा आहे. प्रसन्न अशा माणूसपणासाठी लग्न करायला हवं .म्हणून जे आवडत नाही,नकोसं वाटतं त्यावर टीका करण्यापेक्षा खुल्यामनाने विचार करायला हवा आणि मार्ग शोधायला हवा.


Thursday 23 February 2012

काळ बदलला.









आजी तू बडोद्याहून या छोट्या खेड्यात कशी आलीस? सांग ना?
 आजी खुशीत असली आणि आमच्या बरोबर अघळ पघळ बोलायला तयार असली की आम्ही हमखास हा प्रश्न विचारायचो . कधी कधी ती उडवा उडवीची उत्तरे देई .म्हणे आले विमानतून नाहीतर तुझ्या या कंपूतून . आम्ही कम्प्युटरला कोणत्याही नावाने हाक मारायचो किंवा तो चालत नाही,मूर्खच आहे.असं काहीतरी बोलायचो.तर तिने त्याचे नाव पप्पू  सारखे कंपू ठेवले होते. आजी कधी कधी गंभीरपणे तिच्या लग्नाची गोष्ट सांगत असे. ती म्हणे ह्यांच्या वडीलांनी की आजोबांनी मला एकदा कोणाच्या तरी घरी पहिले होते. मग त्यांनी कोणाची कोण चौकशी केली पण पत्ता विसरले.मग काय करणार .परत ते बडोद्याला आले,ज्यांच्या घरी उतरले होते तिथे गेले आणि पत्ता शोधला.मला आठवत नाही पण बहुतेक १३ व्या वर्षी  माझे लग्न झाले. काही अंतर चालत ,मग बैलगाडीत ,मग मोटारीत .अशी दरमजल करीत आमची स्वारी इथे आली.
     म्हणजे तू आबांना पाहिलंच नव्हतं.
          नाही ग बाई.तेव्हा काही क्लीकची सोय नव्हती.
तिला क्लिक ची फार गंमत वाटायची . तिच्या नातवंडांना सगळ्या गोष्टी क्लिकवर लागतात किंवा क्लिक व्हायला लागतात. असं ती कधी आरोप म्हणून तर कधी कौतुक म्हणून सांगायची.
     बरं जावू दे. तू आत्याचं लग्न कसं ठरवलस ?
तुला काय करायच्या फालतू चौकश्या?तू जमवलस ना क्लिक वर?
  हो.माझं लग्न ऑन लाईन वेब साईट वरून जमलं म्हणून ती असं बोलते.मी लग्न ठरवले तरी मला लग्नाच्या फालतू चौकश्या करते म्हणून रांगवते .तरी तिने आत्याच्या  लग्नाचे सांगायला सुरुवात केई.
    आम्हाला शेजारच्यांनी माहिती सांगितली. म्हणून मी पत्र लिहले .तर मुलगा कुठे शिकायला गेला होता. मग काय करणार?मी धाडसाने त्याचा पत्ता विचारला आणि मुलीचा फोटो आणि माहिती दिली पाठवून . वर त्याला बजावलं ,तुला आवडली नाही तर हरकत नाही पण मी तुला माहिती पाठवली हे घरी कळवू नकोस.
      आजीच्या काळातली तिची ही कृती म्हणजे एक धाडसच होते.पण तिने ते केले. आज जेव्हा आपण फोन,मोबाईल,नेट यांचा वापर करतो आहोत,तेव्हा आपल्याला या गोष्टींचं कदाचित महत्त्व वाटणार नाही. पण त्या काळात म्हणजे ३५ वर्षापूर्वी या सर्व गोष्टी खूप अवघड होत्या.
    आता काळ अधिक वेगाने बदलत आहे. तुम्हांला माहित असेल २०२० साली जी मोबाईल क्रांती भारतात अपेक्षित होती ती २००५ सालीच आली. म्हणजे हे ध्येय आपण आधीच पूर्ण केले. मोबाईल ही गरज झाली. स्वतःचा पीसी ,laptop असणं ,त्यावर अधिक वेगाने काम करणं,हे काळाबरोबर राहण्यासाठी आवश्यक झालं आहे.बघा ना मी ज्या आजीच्या लग्नाचा उल्लेख केला त्यात एकमेकांना भेटण,एकमेकांची माहिती गोळा करणं आणि ती विश्वासार्ह्य आहे की नाही ते ठरवण हे किती अवघड होतं . शिवाय  ती कोणत्या गावात येणार ,ते कसं असणार याबद्दल तिला कोणी माहिती दिली नाही की ती माहिती मिळवण्याचा स्त्रोतही उपलब्ध नव्हता.

    पण आज तिच्या नातीला जेव्हा लग्न करायचे आहे,तेव्हा तिला विवाह संस्थांची मदत होवू शकते . त्याच बरोबर ऑन लाईन विवाहसंस्थावर नोंदणी करून ती तो मुलगा ,त्याचे शहर ,कंपनीची जागा याची सर्व माहिती त्या मुलाला न भेटता घेवू शकते.आज तिची ती गरज आहे. कारण आपल्या राहण्याची,काम करण्याची जागा दूर आहे. तिथे जाण्या येण्यासाठी तिचा वेळ जातो. शिवाय प्रत्येक वेळी कोणाच्या घरी जावून भेट द्यायची किंवा कोणाला आपल्या घरी बोलवायचं म्हणजे वेळ आणि पैसा दोघांचा व्यर्थ जाईल. म्हणून विवाह जमविण्यासाठी ती नव्या माध्यमाचा उपयोग करत. काहीजण हे नवे मध्यम जुन्या पठडीत वापरतात.पण बदल होत आहे. हे मात्र   नक्की .

   मित्रानो आपण काळाबरोबर राहण्यासाठी भौतिक वस्तूंचा खूप उपयोग करतो किंवा ते आपण वापरतो म्हणजे आपण आधुनिक आहोत असेही म्हणतो.
   पण विचार करण्याचा तो बदलण्याचा   वेग मात्र अतिशय मंद आहे. संवादाची सर्व कौशल्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथेच करतो. या संवादाचा वापर आपण आपल्या नातलगांसाठी केला तर अधिक ताणरहित आपल्याला राहता येईल.
     अनेक अशा विवाह संस्था आहेत  की ज्या ऑन लाईन काम करतात. त्यांना समाजाची गरज समजली आहे. आपलं फक्त महत्वाचं काम हे आहे की आपण कोणती संस्था अधिक विश्वासार्ह्य आहे. हेपण विचार करण्याचा तो बदलण्याचा   वेग मात्र अतिशय मंद आहे. संवादाची सर्व कौशल्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथेच करतो. या संवादाचा वापर आपण आपल्या नातलगांसाठी केला तर अधिक ताणरहित आपल्याला राहता येईल.
     अनेक अशा विवाह संस्था आहेत  की ज्या ऑन लाईन काम करतात. त्यांना समाजाची गरज समजली आहे. आपलं फक्त महत्वाचं काम हे आहे की आपण कोणती संस्था अधिक विश्वासार्ह्य आहे. हे बघण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी आपल्याला योग्य माहिती मिळेल ,शिवाय निर्णय घेण्यासाठी ,स्वतःच्या समस्या मांडण्यासाठी जागा असेल.आपलं कोणी ऐकून घेईल . त्यावर उपाय  सुचवील अशा संस्थेकडे जावे.
   मित्रांनो आपण सर्वजण वस्तूंचा उपयोग करण्यात पुढे गेलो आहोत ,आता विचारांचा मागोवा घेवू या. आणि बघू या काही बदल स्वीकारता येतात का? पण हे बदल नक्की कोणते हे मात्र आपण पुढील काही सदरात पाहू या.

Wednesday 22 February 2012

गोष्ट यशची आणि नीताची

www.daptaryswiwah.com
"लग्न करणं " ही जबाबदारी आहे असं खूप जणांच मत आहे.आणि ते बरोबर ही आहे .दोन स्वतंत्र व्यक्ती आयुष्यभर एकमेकांच्या बरोबर राहणार असतात .त्यात ते दोघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वाढलेले असतात. त्यामुळे काही गोष्टींबाबत त्यांचे मत ठाम झालेले असते. ते ठाम मत बरोबर की चूक हे ते स्वतःला ओळखायला लागल्या शिवाय काही कळत नाही. स्वतःला नीट ओळखलं की कोणतही मत मग आपण दुसऱ्यावर लादत नाही.नीट चर्चा करून पटवून देतो.किंवा काही काही मतं कधीच एकमेकांना पटत नाही. पण त्याबरोबर आपण राहायला शिकतो.पण त्यासाठी लवचिकता हवी हे मात्र खरं.नाही का?

Monday 20 February 2012

खुसखुशीत गप्पा



मा. शरद उपाध्ये गुणमिलनावर बोलतांना
  मित्र -मैत्रिणीनो आज सगळ्यांनाच पत्रिका बघून लग्न करण्याची इच्छा आहे. कदाचित त्यामागे आजची असुरक्षितता असेल. बदलत्या काळाला तोंड देतांना कशाचा तरी आधार घ्यावा असं वाटत असेल.आपल्या जोडीदाराबद्दल आधीच पत्रिकेमधून कळले तर बरं होईल असं वाटत असेल.कारण कोणतेही असो.पण सगळ्यांना पत्रिका बघायची आहे. काहीचं म्हणणं आहे की,काही वाईट तर होणार नाही ना बघितल्यावर मग काय हरकत आहे. खरच त्याचे परिणाम  चांगले होणार असतील आणि त्याचा आधार मर्यादित घेणार असाल तर हरकत नाही.पण पत्रिकेमुळे लग्न जमण्यास उशीर लागत असेल,किंवा स्वभाव,आवडी-निवडी ,कुटुंब यांचा मेळ बसत असेल आणि पत्रिका जमत नसेल तरी नाही म्हणायचं का? म्हणजे समोर आपलं जुळू शकतं असं दिसत असून न पाहिलेल्या ग्रह-तारे वेठीला धरायचे का?   याबाबत शरद उपाध्ये यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले आणि पालक व मुला-मुलींना काही टिप्स दिल्या.

Saturday 18 February 2012

जोडीदाराचा शोध


जोडीदाराचा शोध
 







हे बघ पोरी तू माझ्या मुलाचं लग्न जमवून दिलं तर मी मस्त बक्षीस देईन तुला.पार कलवरिचा मान देवून चांगली पैठणी नेसविनआमच्या ऑफिस मध्ये येणाऱ्या काकू म्हणत होत्या.
    मला हा भाग जरा गमतीचा वाटला.काय बोलणार त्यांच्याशी?तरी मी म्हटलं,कशी मुलगी हवी तुम्हांला? आमच्या मुलाच्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करणारी. मी मनात म्हटलं,याला काय अर्थ आहे? तुमच्या  मुलाने /मुलीने  १०० मुली/मुलं पहिल्या तरी असं काही होणार नाही.कारण जोडीदार निवडतांना तो तरी परिपूर्ण आहे का? याचा विचार त्याने केला आहे का?
    आज अनेक मुलं-मुली,जोडीदार निवडीचा निर्णय घेवू शकत नाही.याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ते स्वतःला पुरतं ओळखत नाही. जी व्यक्ती स्वतःलाच ओळखत नाही ती सहजीवनासाठी योग्य व्यक्तीचा शोध कसा घेणार?कारण ते एकाचवेळी अनेक ठिकाणी माहिती बघतात आणि त्यांचे मन सतत हेलकावे खात राहते. मुख्य म्हणजे अशा लोकांचे स्वतःवर खूप प्रेम असते. त्यामुळे ते दुसऱ्याकडून खूप अपेक्षा करतात. त्यांच्या मनात या अपेक्षांचा आणि स्वतःला ण ओळखण्याच्या स्थितीमुळे खूप गोंधळ उडतो व ते निर्णय घेवू शकत नाही.
       जेव्हा आई-वडील किंवा इतर कोणी या मुलांना माहिती देतात किंवा निर्णय घेण्यास मदत करू इच्छितात तेव्हा ते म्हणतात,ठीक आहे,नंतर बघू,आत्ता लगेच काहीच सांगता येत नाही,नंतर विचार करून सांगीन.... काही जण समोरच्या व्यक्तीला स्पष्ट हो-नाही काहीच सांगत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने फोन करावा की करू नये,काय आवडेल हे त्यानाही कळत नाही.त्यामुळे दोन्ही बाजूला निर्णय घेतला जात नाही.काहीवेळेस ही मुलं-मुली बाहेर मित्र-मैत्रीणींत मोकळी राहत असली तरी ते एका रिजिड कुटुंबातून आलेले असतात. जोडीदार शोधतांना ते त्या दृष्टीने बघतात आणि त्यामुळे चांगल्या गुणांचा जोडीदार एखाद्यावेळी डावलला जातो. अशावेळी त्यांनी एखाद्या समजूतदार व्यक्तीशी बोलायला हवे आणि ते ही लवकरात लवकर. नाहीतर वेळ निघून गेली की वाढलेलं व् फक्त हातात येतं. कारण ‘लग्नाचा’क्षेत्रात तिथलेच नियम लागू होतात. तुमचं वाढलेलं वय हे तुम्हांला लग्नाच्या बाबतीत खूप मागं नेवून उभं करू शकतं.मग तुम्ही सुरुवातीला केलेल्या अपेक्षा क्मिक्र्त आणतात आणि हाती मात्र कोणतीच मनासारखी गोष्ट मिळत नाही.
    नितीन आणि रेखा कायम निर्णय घ्यायला घाबरायचे.त्यांना कोणताच वाईटपणा पत्करायचा नसायचा किंवा धोका वाटायचा. त्याची जबाबदारी कशी घेणार हे त्यांना कळायचे नाही.ते त्यांच्याच विचारात अडकून राहयचे. जसे एखाद्या ठिकाणी जायला अनेक रस्ते असतात. एका रस्त्याने चालायला लागले की त्यांना वाटायचे दुसरा रस्ता अधिक चांगला आई जवळचा आहे.असं करत करत ते प्रत्येक रस्त्यावरून थोडे थोडे चालले पण योग्य ठिकाणी पोहचले नाही.
  खरं तर आज सगळीकडे झपाट्याने बदल होत आहेत,आपण ते स्वीकारतही आहोत. अशा धावपळीच्या अस्थिर,असुरक्षित जगात कोणताही निर्णय पूर्ण चुकीचा किंवा पूर्ण बरोबर असा नसणारच. तो व्यक्ती सापेक्षच असणार.स्थळ-काळानुसार त्यात बदल होत जाणार. म्हणून पूर्ण विचार करून योग्य निर्णय घेणं गरजेचे आहे. तो घेतांना धाडस लागते हे नक्की.आपण लहानपणापासून स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही, rather तशी सवयच आपल्याला कोणी लावलेली नसते.मोठ्या माणसांनी सांगितलेलं आपण निमूट ऐकायचं. हाच शिरस्ता सर्वसाधारण घरात असतो. त्यामुळं मुलांना चुका करण्याची संधी मिळत नाही.पण जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेत एखादी व्यक्ती स्वतःच निर्णय घेवू लागली तर लगेच आक्षेप घेतले जातात.आता हेच बघा ना?संजयची आई नेहमी म्हणायची,माझा मुलगा माझ्या हाताबाहेर नाही’पण आज तो आईने कितीही स्थळं दाखवली तरी ते बघायला तयार नाही. त्याला काहीच करू वाटत नाही. म्हणून मित्रांनो निर्णय घ्यायला घाबरू नका. नाहीतर लग्नासाठीचे तुमचे वय  वाढत जाईल,तुमच्यासाठीचा चाललेला योग्य जोडीदाराचा शोध थांबवाबा लागेल.
    .

Thursday 16 February 2012

स्व-दृष्टिकोन


स्व दृष्टिकोन
     स्त्री –पुरुष,मुलगा-मुलगी यांना आज लग्न करतांना काहीवेळेस समान तर काहीवेळेस वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. लग्न करतांना, जोडीदार निवडतांना ते समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तपासून बघतात आणि हे नाही,ते नाही या नकारात्मक भावनेने बघतात. त्यामुळे बहुतेक वेळा निराशा निर्माण होते.
   एका लहानशा गोष्टीने मला नक्की काय म्हणायचे आहे, ते स्पष्ट होईल.
एका लहानशा गावात छान सकाळ होवू लागली होती,सूर्य उगवत होता. एक घोडेस्वार येवून थांबला,आणि त्याने वेशीजवळ बसलेल्या एका वृद्धाला विचारले,’मी या गावात राहायचे ठरवून आलो आहे.जुनं गाव मी सोडून दिलंय. तर या गावातले लोक कसे आहेत ते तुम्ही सांगाल का?
    तेव्हा त्या वृद्धाने अतिशय समजूतदारपणाची गोष्ट विचारली. तो म्हणाला,तू जे गाव सोडून आलास त्या गावातले लोक कसे होते?
  तो माणूस म्हणाला,त्यांचं नाव नका घेवू. त्यांच्या आठवणीसुद्धा नको वाटतात. त्या गावातले लोक फार दृष्ट  आणि वाईट आहेत. त्यांनी मला इतका त्रास दिला की, त्यामुळे मला गाव सोडून यावं लागलं.
  तो वृद्ध माणूस म्हणाला,मित्रा तू दुसऱ्या  कुठल्या तरी गावाला जा. या गावातले लोक तर त्यापेक्षाही वाईट आहेत.
   तो घोडेस्वार पुढे निघून गेला. त्यानंतर एक बैलगाडी येवून थांबली. तिच्यात एक कुटुंब होतं. त्यातल्या लोकांनाही त्या वृद्धाला विचारले की या गावातले लोक कसे आहेत? आम्ही आमचं गाव सोडून आलो आहोत आणि या गावात राहायची इच्छा आहे.
   वृद्धाने पुन्हा तोच प्रश्न विचारला,’ तो म्हणाला,मला सांगा,तुम्ही जो गाव सोडून आला तिथले लोक कसे होते?
     गाडीतला माणूस म्हणाला,त्याचं नाव घेतलं,त्यांची आठवण झाली की माझं ह्र्दय  आनंदानं भरून जातं. त्यांच्या सारखी भली माणसं या धरतीवर क्वचितच असतील. माझं मन भरून आलं आहे.
   तो म्हातारा म्हणाला,या आम्ही तुमचं स्वागत करतो. या गावातली माणसं तुम्हांला तुमच्या त्या गावापेक्षाही चांगली वाटतील.
  ही लहानशी गोष्ट तुम्हांला सांगायची होती. गाव तेच होतं.पण दोन वेगवेगळ्या माणसांना वृद्धाने वेगवेगळी उत्तरे दिलेली होती. गाव कसं असेल हे कशावर अवलंबून आहे? मी कसा आहे याच्यावर ते अवलंबून आहे.
   अनेक मुलं-मुली लग्न ठरवितांना ९०-१०० मुलं-मुली पहिल्या. हे अभिमानाने सांगतात. ते पाहतांना त्यांनी स्वतःच व्यक्तिमत्व तपासलेलं असतं का? कोणत्या फुटपट्टीने ते दुसऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तोलतात. काय शोधत असतात ते? ते त्यांना तरी नीट समजलेलं असतं का? आपल्या व्यक्तीमत्वात जे नाही ते आपल्याला सगळं जगही नाही देवू शकत आणि आपल्या व्यक्तीमत्वात जे आहे ते सगळ्या जगाची ताकदही आपल्याकडून हिरावून नाही घेवू शकत. तुम्ही समजूतदार नसाल,उदार नसाल तर दुसरं कोणी तुम्हांला समजून घेईल,तुमच्या विषयी उदार राहील अशी अपेक्षा करू नका. तुम्ही चिडके,रागीट आहात,अशांत आहात ते तुमच्या व्य्क्तीम्त्वातल्या कुठल्यातरी मुलभूत चुकीमुळे. ही गोष्ट जर लक्षात आली नाही तर आपण परिस्थिती बदलण्यात,व्यक्तींना बदलण्यात आयुष्य वाया घालवतो आणि स्वतःला बदलण्याकडे आपली दृष्टीच जात नाही.
   जोडीदार निवडतांना ही स्वतःतला बदल फार महत्वाचा आहे. तो झाला की ,समोरच्या व्यक्तीची उंची,सौंदर्य,अंगकाठी,शिक्षण,पैसा या पलिकडे आपण पाहतो आणि विचार,भावना,संवेदनशिलता यांच्या साहय्याने आपल्यासाठी योग्य जोडीदाराची निवड करतो. कारण या गोष्टींच्या साहय्याने जेव्हा आपण जोडीदाराची निवड करायला जातो तेव्हाच तो आपल्याला बरोबर क्लिक होतो. Best Luck.वरील गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की जीवनाकडे पाहण्याचे ढंग,जीवनाविषयीची नजर,attitude दोन प्रकारचे असू शकतात. तुम्हीच ठरवा आपण जीवनाकडे कसं बघणार ते?
  

Wednesday 15 February 2012

चर्चा हवीच.


मला मुळी अशा रूढ पद्धतीने लग्नच करायचं नाही.माझं असं,माझं तसं.असं  प्रज्ञा तावातावाने आम्हांला सांगत होती. तिला अनेक जणांनी साथ दिली.विवाह पूर्व मार्गदर्शनाच्या  कार्यशाळेचा शेवटचा टप्पा चालू होता. तेवढ्यात या सगळयांनी एकच कल्हा केला. म्हणून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एका रविवारी कॉलेजमध्येच 'लग्न' या विषयावर मोकळेपणी बोलण्यासाठी एकत्र जमायचं आणि खूप बोलायचं.
   विवाह,कुटुंब या समाज जीवनातल्या महत्वाच्या संस्था आहेत. लग्न ही महत्वाची आणि प्रत्येकाला करून बघावी अशी वाटणारी घटना आहे. असं मानतात. तरून मुला-मुलीना लग्नासंदर्भात अनेक प्रश्न पडतात,काही बदल करावेसे वाटतात. तरीपण या एका महत्वाच्या घटनेविषयी फारशी देवघेव होत नाही. तरुण मुलंही आपसात या संदर्भात बोलत नाही. काहीजण मात्र गंभीरपणे व प्रामाणिकपणे बोलतात.
    आमच्या "या" या आमंत्रणाला मान देवून कॉलेजच्या आवारात अनेकजण जमले होते. त्यात नवविवाहिता  बरोबरच अविवाहित,आजी-आजोबा शोभतील असेही लोक आले होते. यातील काहींना  निमंत्रित वक्ते बोलण्यासाठी  हवे होते. पण आम्ही त्या कार्यक्रमाचे स्वरूप चर्चेचे ठेवले होते. त्यामुळे आमच्या एका मैत्रिणीने प्रत्येकाला बोलण्याची ,विचार मांडण्याची संधी मिळेल.अशा पद्धतीने संचलन केले.त्यामुळे ज्यांना 'लग्न' या घटनेबद्दल आस्था आणि काळजी होती ते प्रत्येकजण संवाद साधू लागले. आमच्या असे लक्षात आले की खूप जणांना बोलायचं आहे,त्यांच्या मनात काय काय खदखदत आहे. लग्नासाठी निवड करतांना येणाऱ्या अडचणी,घुसमट ,अपमान खूप आहे.त्यात अहंकाराचे पाडाव ही भरपूर आहेत.त्यात वरपक्ष,घराणं ,सांपत्तिक स्थिती,वधूपक्ष याही गोष्टींचा समावेश आहे. तसेच दोन पिढ्यातील अंतरामुळे येणारा विषम दृष्टीकोन आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत.
   हे सगळं ऐकतांना ,बोलताना आमच्या लक्षात येत होतं की असा एक गट कायमस्वरूपी एकमेकांना भेटायला हवा. त्यांनी चर्चा करून मार्ग काढायला हवा. म्हणजे काही कृतीशील योजना कार्यान्वित होईल आणि वैचारिक स्पष्टता येईल. मला जोडीदार कसा हवा हे बघतांना स्वतःची ओळख पटायला हवी.मला केवळ खाणं-पिणं ,पोषाख यापलीकडे काय आवडत.माझी जीवनशैली -कार्यशैली काय आहे हे कळायला हवं.
   तसेच लग्न/विवाह का केला जातो याची यादी केली तर काय दिसेल? मुलींच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला जीवापाड प्रेम करार,आधार देणारा,सोबत देणारा जोडीदार हवा असतो.स्वतःच आपलं 'घर'हवं असतं. आई-वडिलांची काळजी कमी करायची असते. लहान बाळाची आवड असते. मुलांच्या दृष्टीने विचार केला तर एक हक्काचं माणूस मिळवायचं असतं किंवा चारचौघांसारखा संसार करावा वाटतो. एका छान जोडीदाराची सोबत हवी वाटते.
   सोबत हवी असं दोघानंही वाटते. पण निवड कशी करायची हे कळत नाही. पण जन्माचा जोडीदार निवडतांना रूप सर्वात महत्वाचं नाही हे लक्षात ठेवायला हवं फक्त बघताक्षणी नकोसेपणाची भावना मनात येत नाही ना? हे बघायला हवं. किमान आर्थिक सुरक्षितता आणि त्यासाठी मुलभूत शिक्षण कर्तृत्व यांचाही विचार ओघानच आला. आरोग्याचा विचारही करावा.पण या सर्वांच्या पलीकडे अजून कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात .उदा. वाचन,संगीत,खेळ,प्रवास,सामाजिक काम,नोकरी-करीयर ,अभ्यास   इ. किंवा natk-सिनेमा ,दारू ,सिगारेट ,खरेदी इ. यासारख्या कुठल्या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या वाटतात आणि त्या जोडीदाराला फालतू किंवा अत्यंत गैरलागू वाटत असतील तर त्याबाबत एकमेकांशी बोलायला हवं .कारण तारुण्य सुलभ शारीरिक ओढ आणि एकूणच संसारिक जीवनातील नवलाईचा पहिल्या काही वर्षांचा काळ ओलांडल्यावर खर वास्तव दिसायला लागतं.म्हणूनच हे सारं प्रत्यक्षात दिसण्यापुर्वी लग्न ठरवतांना वरील गोष्टींचा मोकळेपणी विचार करायला हवा.कारण आपल्याला लग्न केवळ टिकवायचे नाही.तर त्यातून ताज्या टवटवीत माणूसपणाचा अनुभव घ्यायचा आहे. प्रसन्न अशा माणूसपणासाठी लग्न करायला हवं .म्हणून जे आवडत नाही,नकोसं वाटतं त्यावर टीका करण्यापेक्षा खुल्यामनाने विचार करायला हवा आणि मार्ग शोधायला हवा.

Tuesday 14 February 2012

सुगंध शोधू या


  सुगंध शोधू या
      लग्नासाठी आम्ही एका छोट्या गावात गेलो होतो. लग्नही संत्र्यांच्या बागेत होतं .कारण ज्या मुलाचं लग्न होतं त्याने ती बाग फुलवली होती आणि त्या बागेबद्दलची कृतज्ञता म्हणून त्याच्या आयुष्याला तो त्या बागेपासून सुरुवात करणार होता. विशेष म्हणजे त्या मुलीलाही या सर्व गोष्टींची आवड होती. विशेष म्हणजे त्या मुलीलाही या सर्व गोष्टींची आवड होती. ती हि शेतकी कॉलेजमध्ये शिकत होती . त्या दिवशी त्यांच्या गावच्या प्रथेप्रमाणे गावातील दोन यशस्वी जोडप्यांशी  गप्पा होत्या. यश हे त्यांनी पैसा,मुल,घरदार या हिशोबात मोजले नव्हते. तर त्या घरातील आनंद आणि स्वस्थता यावर त्यांनी लक्ष दिलं होतं .
   तर यातील एका जोडप्याने सांगितलं कि, आपण मुलीला-मुलाला किती पैसा ,दागदागिने ,भारीतले कपडे दिले या बाह्य पसाऱ्यावरच लक्ष देतो. आतली मुळं कशी आहेत त्यांना कसं पाणी  हवं आहे .याकडे लक्षच देत नाही. त्यामुळं लग्न झाल्यानंतर वर्ष-दोन वर्षातच सगळ्याचा कंटाळा येवू लागतो आणि आपण मॉल,शॉपिंग यांसारख्या गोष्टींकडे  धाव घेतो. त्यामुळे जीवनातलं खरं संगीत विकसितच होत नाही.
   फार अवघड आहे ना? हे सर्व स्न्जून घेणं .यासाठी एक लहानशी गोष्ट सांगते. मओत्से तुंगने याची लहानपणची आठवण लिहिली आहे. तो म्हणतो,.
        मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आईची एक सुंदर बाग होती. तिच्या बागेतली फुलं बघायला दुरदुरच्या गावातून लोक यायचे. तिच्या फुलांची खूप स्तुती व्हायची आणि म्हातारपणीचा तिचा हाच एक आनंद होता तिची फुलं आणि तिचा बगीचा.पण एकदा ती खप आजारी पडली,तिला रोपांची देखभाल करणंहि शक्य होईना.तिला आपल्या आजारपणाचं एवढ दुःख नव्हतं.फुलं कोमेजायला लागली आणि रक्ताचं पाणी करून ज्यांना वाढवलं ती रोपं मरायची वेळ आली, याचं दुःख जास्त होतं.तिच्या आजारपणाची तिला काळजी नव्हती. फुलं नष्ट होणार यामुळं ती काळजीत होती,दुःखी होती.
  तेव्हा माओ तिला म्हणाला कि,घाबरू नकोस मी घेईन तुझ्या फुलांची काळजी आणि माओ सकाळपासून संध्याकाळ पर्यंत त्या बागेची काळजी घेवू लागला.पण दोन-चार दिवसांतच असं दिसून आलं कि,त्याचे सगळे प्रयत्नवाया जात आहेत. बाग उजाड व्हायला लागली. फुलं कोमेजायला लागली. पानं वाळू लागली. रोपं मरणोन्मुख झाली.पंधरा दिवसातच बाग सगळीच उजाड झाली. आईला थोडं बरं वाटायला लागलं तेव्ह ती बाहेर आली.बागेत जावून पाहिलं तर तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.माओ पण रडायला लागला. तो म्हणाला,मी एकेका फुलाला कुरवाळलं ,एकेका फुलाला पाण्यानं धुतलं ,एकूण एक पान पुसून स्वच्च केलं.त्यांच्या वरची धूळ झटकली. फुलं कोमेजतच आहे.
  त्याची आई म्हणाली,वेड्या डोळ्यातली आसवं पूस ,चूक कुठे झाली ते समजलं . तू हे विसरलास आणि  कदाचित तुला ठाऊक ही  नसेल,अरे फुलांचे प्राण फुलात नसतात,मुळात असतात. मुळं दिसत नाहीत.फुलं दिसतात.पानं दिसतात.मुळं जमिनीत लपलेली असतात.प्राण मुळात असतात.
     माणसाचं,त्याच्या जीवनाचही असंच असतं. वरवर एखाद्या व्यक्तीचं शरीर  सुंदर दिसतं ,त्यांचं जीवन खूप समृद्ध वाटतं,ते त्याच्या कामात,त्याच्या दिनचर्येत त्याच्या घरात पण त्याच्या आत कोणती समृद्धी आहे ती लपूनच राहते. सुंदर घर,गाडी,सुखसोयी,स्पर्धेच्या रेट्यातील शिक्षण हे आपल्याला दिसतं.त्यावरच आपण लग्न ठरवायला जातो. पण ती व्यक्ती सुध्दा तिच्या आतल्या जीवनाला आत्माला विसरून जाते. त्यांना पाणी घालत नाही.आपल्या समृद्धीची मुळं त्या आतल्या जीवनात आहे.
   पण त्याच्याशी न आपल्या शिक्षणाचा संबंध आहे न सभ्यतेचा. न आपल्या संस्काराचा,न आपल्या समाजाचा .आपण आपल्या मुलांना-मुलीना खूप महागड शिक्षण देत आहोत,त्यांना चांगले कपडे देत आहोत. चांगलं भोजन देत आहोत.त्यांच्या जीवनासाठी सर्व प्रकारच्या  सोयी उपलब्ध करून देत आहोत.पण तरीही तो माणूस कोमेज्लेलाच दिसतो.त्याच्या जीवनातून कुठलाच सुगंध येत नाही.
     म्हणून लग्नानंतरहि आपलं जीवन छान सुगंधित व्हावं वाटत असेल तर आपली मुळं कोणती याचा नक्की विचार करा. म्हणजे पुढच्या काही वर्षात तुम्हाला यशस्वी जोडपं म्हणून बोलवू.